Saturday 19 November 2016

धमाल

धमाल 

शाळेत असताना सुट्टीत करायचे हे ठरलेले नसायचे .मनात येईल तसे करायचे , मनाला वाटेल तसे आणि तिकडे भटकायचं .कधी पर्वती , कधी लॉ कॉलेज टेकडी  ,वेताळ टेकडी कधी सिंहगड तर कधी मुळशी .

कधी दोन पायाने ,कधी सायकल ने तर कधी एस टी ने .

अशीच एकदा सणक आली आणि आम्ही तीन मित्र निघालो .पहाटे उठून कर्वे रोड ला एस टी पकडली . स्थानापन्न झाल्यावर आजूबाजूला बघितले तर शहरी फक्त आम्हीच .बाकी सर्व गावकरी , शेतकरी आणि गवळी .प्रत्येका जवळ एकादी पिशवी ,  काठी ,दुधाची कासंडी त्यांचे कपडे ही बरेचसे सारखेच . लांब पांढरा  शर्ट , पांढरा लेंगा किंवा धोतर , खांद्यावर एखादे फडके किंवा धोंगडे , डोक्यावर तिरकी किंवा आडवी बसवलेली  गांधी टोपी किंवा मुंडासे . बहुतेकांची तोंड बंद , तंबाकू चा बार ठासून भरलेला . 

एसटी ने पौड फा टा  सोडला की मोकळीक दिसू लागायची ..सगळी कडे शेत , अधून मघे एखाद्या शेतात झोपडी ,त्याबाहेर बांधलेल्या गाई ,म्हशी , शेळ्या ,कुत्री नजरेस पडायची ..त्यातील एखादे कानात वारं भरल्या सारखे एसटी ची पाठ धरायचे ..भुंकून भुंकून थोडे अंतर पाठलाग केल्या नंतर त्यातील फोलपणा लक्षात येऊन ते ओशाळे होऊन परत शेतात जायचे .

सकाळची थंड हवा एसटी च्या फुटक्या काचां मधून अंगावर येत असे .

खिळखिळीत झालेली एसटी ,खडखडाट करत मार्ग आक्रमायची . मध्येच स्टॉप आले की  ती थांबायची .प्रवासी चढले की एक गचका मारून पुढे चालू पडायची ..चांदणी चौक , भूगाव भुकूम  पिरंगुट घाट , पौड गाव ( येथे कायमच अजून सुद्धा पौडाचा म्हातारा , म्हाताऱ्याची बायको ,हे गाणे कायम आठवते) , मग सरळ सरळ रस्ता आणि मग एक चढ संपला की मुळशी ..

अंगावरची धूळ झटकत खाली उतरले की उरलेली थोडी वाहणाऱ्या वार्याबरोबर उडून जायची ..त्या थंडगार वार्याने अंगातून एक शिरशिरी जायची .सभोवताली पाणीच पाणी व खाली धरणाची भिंत ..त्यावेळी सीक्युरिटी वै भानगड नसल्याने आम्ही सरळ पाण्याकडे पळत सूटायचो . पाण्यात यथेच्छ खेळून पलीकडेच उभ्या असणाऱ्या लाँच कडे आम्ही जायचो .इतर काही प्रवासी तिथे थांबलेले असायचे . ठराविक आकडा झाला की लाँच सुटायची . दुगडुग आवाज करीत पाणी कापत आम्ही निघायचो .विस्तीर्ण जलाशय आणि आजूबाजूला डोंगर आणि दाट झाडी .लाँचच्या चाहुलीने पाण्यातून एकदम हवेत झेप घेणारे पाणबगळे आणि पटापट बाजूला पोहत पळणाऱ्या पाणकोंबड्या मन वेधून घ्यायच्या मध्येच एखादा मासा पाण्यातून उडी मारून परत पाण्यात अदृश्य व्हायचा त्याचा छानसा चुबुकक असा आवाज यायचा .,त्याच्या मुळे उठणारे तरंग लाँच च्या तरंगात मिसळून जायचे 

बगळे ,पाण कोंबड्या ,मासा व लाँच या सगळ्यांचे आवाज एक छान निसर्ग संगीत निर्माण करायचे ..मन आनंदून जायचे ..लाँच चा प्रवास जसे ज्या गाव चे प्रवासी असतील तसा व्हायचा .कधी हा किनारा तर कधी पलीकडचा . तासाभराने लाँच एक काठावर जाऊन थांबायची .तेथे उतरून एक छोटी टेकडी चढून वर गेल की टाटा समूहाच्या मालकीचे टाटा हायड्रो पॉवर चे केंद्र लागायचे . तेथेच माझ्या ओळखीचे बहुतेक सातपुते ( नांव अंधुकस आठवते ) रहायचे .त्यांचा मुलगा माझ्या भावाला  शाळेतून आणण्या पोहचवयायचे काम करत असायचा .

त्यांच्या घरी अगत्याने चहा ,पोहे असा खाऊ मिळायचा ..,त्या दुधाळ गोड मिष्ट चहाची चव अजून मनात ताजी आहे .

खाऊन झाले की ते आम्हाला आजूबाजूला हिंडवायचे . दाट जंगलझाडी मागे उंच डोंगर मोठा रम्य परिसर ..अधून मधून रात्री त्या भागात वाघ येतो असे त्यांनी सां गितले की छातीची धडधड उगीच वाढायची .

मग आम्ही टाटा हायड्रो पॉवर चे  केंद्र बघायला जायचो ..अनेक यंत्र ,बटणे असलेली एक मोठी खोली व तेथून पुढे गेल्यावर प्रचंड मोठे पाईप्स दृष्टीस पडायचे .हे पाईप्स उतारावरून खाली खोल कुठेतरी अदृश्य व्हायचे ..ते पार लोणावळा ,खोपोली पर्यंत जातात असे सातपुते आम्हाला सांगायचे..त्या पाईप वरून चालत गेलो तर लोणावळ्याला जाता येईल असा बालिश विचार मनात येऊन जायचा ..

थोडा वेळ तेथे काढून मग परत काठावर येऊन लाँच ची वाट बघत टिवल्या बावल्या करत वेळ काढायचा व लाँच आली की तीत बसून परत मुळशी कडे प्रवास .आता उन्हाचे चटके बसू लागले असायचे ,मग मध्येच पाण्यात हात घालून ते पाणी तोंडावर मारून घायचे एकमेकांवर उडवायचे असे चाळे चालायचे.

थोड्याच वेळात काठ  धरणाची भिंत दिसू लागयायची. लाँच काठावर लागायच्या आतच आम्ही पाण्यात उडया मारलेल्या असायच्या .त्या गुढगा भर पाण्यातून पाय उपसत बाहेर यायला मजा वाटायची .

परत चढ चढून वर रस्यावर आले की एका टपरीत चहा ,वडापाव ,मिसळ असले काहीतरी खाऊन एसटीची वाट बसायचो ., नसतेच बसायचो असेही नाही .शेजारच्या जाळीतली करवंद काढून आण , सातभाईच्या (सेव्हन सिस्टर्स) च्या थव्या मागे घाव , कुत्र्याच्या पिल्लाशी खेळ असे उद्योग चालू असायचे .

थोड्याच वेळात सूर्य मावळतीकडे झुकायला लागायचा , अंधार पडू लागायचा .आजू बाजूच्या झोपड्यातील दिवे लागायला सुरवात व्हायची .थंडी वाढू लागायची . सबंध जलाशय,ती मोठी भिंत काळोखात बुडून जायची ..

तशातच लांबून धूळ उडवत येणारी एसटी चे धूड बघितले की बरे वाटायचे ..हात दाखवून एसटी थांबल्यावर पटापट उड्या मारून आत शिरताना दार खाडकन लावूंन बसायचे . मग उलटा प्रवास सुरु व्हायचा .अंधारातून सुसाट वेगाने जाणाऱ्या एसटी तुन बाहेरील अंधार बघताना मजा वाटायची ..समोर नजर केली की काळोख चिरत दोन प्रखर दिवे रस्ता दाखवायचे   असेच बघता बघता डोळा लागायचा .दिवसभरच्या दगदगीने आंबलेले  शरीर  एसटीच्या वेगा बरोबर आणि बसणाऱ्या धक्कयांना तोंड देण्याकरता आपोआप ऍडजस्ट व्हायचे .ते त्याच तालात डोलू लागायचे ..मध्येच चला पौड आले असा       कंडकटर चा आवाज ,दार उघडल्याचा ,बंद केल्याचे आवाज अर्धवट झोपेत ऐकू यायचे ..

थोड्याच वेळात "अरे पोरांनो चला पुणे आले असे त्यांनी सांगितले की उतरायचे व एकमेकांचा निरोप घेऊन निघायचे ..आणखी एक मूळशीची ट्रिप संपन्न झालेली असायची .

आता मुळशी बदलली ,मुळशीच का सगळेच बदलले , गर्दी वाढली ,रस्ते मोठे झाले , छोटया झोपड्या जाऊन पार मुळशी पर्यंत मोठया इमारती ,कारखाने उठले . जागेला सोन्याचा भाव आला .अनेक मोठी हॉटेल्स ,क्लब्ज ,फार्म हाऊसेस त्या रस्यावर उभी राहिली .लोकांच्या हातात पैसा आला ,त्याबरोबरीने येणारी सुबतत्ता , गाडी ,सर्वकाही चांगले वाईट आले .

मूळशीतून पुढे कोकणात जाणार ताम्हणी घाट झाला ,तेथे पडणारा पाऊस व धबधबे बघणारा एक नवा वर्ग तयार झाला . महागाई वाढली .दहशत वाद वाढला ,त्यामुळे सीक्यूरीटी वाढली ,पुर्वीची मोकळीक संपली . अविश्वास वाढला .माणुसकी कमी झाली .

आमचा मित्र परिवार ही आपापल्या वाटेने पांगला .आता कधी भेट झाली कि त्या आठवणी निघतात .अरे चला जाऊया परत मूळशीला ,एस्टीनेच जाऊ ,अस म्हणल्या वर चेहऱ्यावरची उमटणारी काळजी बघून हसू येते ..आपण ही किती बदललो , आता स्वतःची एसी गाडी असल्या शिवाय प्रवास नकोसा वाटतो , रहायला बसायला ,खायला सगळे उच्च प्रतीचे ...का ,असे का ? परत एकदा तीच जादू अनुभवायला काय हरकत आहे ? माझी तयारी आहे ?  मित्रांनो तुमची ?

Friday 18 November 2016

ढाबळ

ढाबळ

परवा वाईला जाताना , खेड शिवापूर च्या पुढील एका प्रसिद्ध वडा पाव स्टॉल पाशी थांबलो होतो ...प्रचंड गर्दी असल्याने वडा गाडीतच बसून खात होतो .अचानक एक गलका , उच्च टिपेतल्या हाका व शिट्ट्या कानावर पडल्या .

त्या  कशाच्या आहेत हे माझ्या लगेच लक्षात आले व मी गाडीतून खाली उतरून नजर वर आकाशाकडे केली ..माझा अंदाज खरा ठरला .

दूरवरून उडत येणारा एक मोठा थवा नजरेस पडला. अतिशय वेगाने तो आम्ही उभे होतो त्या इमारतीकडे येऊ लागला . त्या थव्यात पांढरी ,कागदी व नेहमीची राखाडी कबुतरे होती .
हाका व शिट्ट्यचा जोर वाढला . तो थवा तेथे न थांबताच एक झोकदार वळण घेऊन परत दूर गेला .म्हणजे त्या गच्चीत कोणीतरी कबुतरे पाळली असणार व आता तो त्यांना दिवसाची कसरत देत असणार हे लक्षात आले  व माझे मन त्या थव्या च्या वेगा पेक्षाही वेगाने चाळीस बेचाळीस वर्षे मागे गेले .

त्यावेळी मी आठवी नववीत होतो . आम्ही कमला नेहरु पार्क समोरील एका इमारतीत रहायचो .शाळा ही जवळ .मित्र परिवार हा ही जवळच रहाणारा ,प्रभात रोड  भागातला ..या मित्रां मधील बहुतेक सारे तळागाळातील कुटुंबा तील होते .त्यांचे आईवडील माळी काम ,साफसफाई ,भांडी कपडे धुणे अशी कामे करत असत ..ह्या मित्रांकडून  बरेच काही शिकायला मिळाले .झाडां वरील आंबे ,मालकाची नजर चुकवून कसे काढयायचे , टेकडीवर कसे हिंडयायचंए ,पक्षी ,सरडे  गिलवरीने कसे उडवायचे , झाडे कशी ओळखायची ..असे आता विचार करता अवलक्षणी ,विदूळ वाटी बरेच काही शिकलो .
ह्याच मित्रांपैकी एकाला कबुतर  कशी पाळायची ह्या बद्दल माहिती होती .आमच्या सोसायटीला मोठी गच्ची होती . तेथे आपण कबूतर पाळू ,खूप मजा येते असे सांगून त्यांने मला तयार केले.

आम्ही लगेच कामाला लागलो . कबुतर ठेवतात त्या जागेला ढाबळ म्हणतात .एक छोटे खोके ते लाकडात बनवून घेतलेली अनेक घर असे आपापल्या वकुब व खिशातील पैसे ह्यावर त्याचा आकार ठरतो ..आम्ही एक जुने लाकडी खोक आणून त्याची ढाबळ बनविली .त्यात पाण्या साठी एक व अन्न ठेवण्यासाठी अशी दोन प्लस्टिक ची भांडी ठेवली .
पुढे मागे त्यांनी अंडी घेतली ,त्यांना पिल्ल झाली की काय करायचे म्हणून दोन छोट्या लाकडी पेटया ठेवल्या. सर्व तयारी झाली ..आता फक्त स्टार कास्ट म्हणजे कबुतरे येण बँक होते .एका रविवारी आम्ही दोघे बालगंधर्व च्या शेजारी भरणाऱ्या कबुतरांच्या बाजारात गेलो .तेथे अनेक जण कबुतर विकायला बसले होते . हे नको ते नको असे करत करत आम्ही सहा कबुतर घेतली .

घरी आणल्या नंतर त्यांना ढाबळीत ठेवले व वर एक पातळ फडके टाकले .

त्या नंतर दररोज उठल्या बरोबर मी वर जाऊन त्यांना खाणे पिणे देत असे .त्या मित्राच्या  शिकवणीचा उपयॊग होऊन काहि दिवसात च मी त्या कलेत तयार झालो . 

कबुतर उडवून ती परत आपल्याच ढाबळी त परत आणणे ही एक कलाच . त्यात त्यांना व्यायाम हा होतोच पण आपण इतरांची कबुतरे भुलवून आपल्याकडे आणू शकतो . 

सर्व कबुतर एकदम उडवायची नाहीत , काहीचे पंख छाटून ( काही ठराविक पिसे काढली की त्यांना काही दिवस उडता येत नाही)

ती उडून वर गेली की लगेच परत येऊ नयेत म्हणून आरोळ्या ,शिट्या , हातातील फडके उंच उडवणे अशा अनेक करामती करायला लागतात ,त्याही मी शिकलो . आमच्या सोसायटीच्या परिसरात आता रोजच हा कल्ला सुरु झाला .त्याने व कबुतरांच्या विष्ठा व वासाने आजूबाजूची सुशिक्षित ,पांढरपेशी लोक बिथरायला वेळ नाही लागला .त्यातील काहींनी बाबांकडे तक्रार केली ..बाबांना हे सर्व कळल्यावर ते प्रचंड खवळले .त्यांनी मला समोर उभे करून ह्या गोष्टी कशा वाईट आहेत, ह्याने कोणाचेही भले होत नाही , मारामाऱ्या होतात व तुला हे भिकेचे डोहाळे का व कसे लागले ह्याची चौकशी करून माझे  बॊद्धीक घेतले. हे सर्व चालू असताना तो माझा मित्र गुरु तिथून जो गुल्ल झाला तो पुन्हा केव्हाच परतला नाही . ताबडतोब हे धंदे बंद झाले पाहिजेत असा सज्जड दम मला लाभला .

ती ढाबळ,ती कबुतरे, त्यातील पिल्ल , ती भांडी सर्व गेले .गच्चीतला तो कोपरा मोकळा झाला ..कायमचा ..

आता मागे वळून पहाता असे जाणवते की मी व बाबा दोघेही आपल्याला भूमिकेतुन त्या कडे बघत होतो .दोघेही आपापल्या परीने बरोबर होते .त्यांना माझ्यावर होणारे संस्कार ,माझे भवितव्य , माझे शिक्षण हे दिसत असणार ,त्यांना त्याची काळजी असणार व मला त्या छंदा तले थ्रील ,त्यातील मजा हे आकृष्ट करत होते .

पण तो छंद तेथेच थांबला ..

परवा तो कप्पा अचानक उघडला ..तो आठवणींचा कोपरा अचानक उजळून निघाला ...

सुनील

१८.११.२०१६

Tuesday 1 November 2016

Menvali ghat ,Wai ek nisargchitra

निसर्गचित्र 

काल वन डे वाई ट्रिप केली .

बरेच दिवस मेणवली मधील नाना फडनवीसांचा वाडा आणि घाट बघायचे मनात होते .

वाई पासून तीन  किमी वर हे वसलेले आहे .वाई च्या वेशीवर एक मोठे  लाकडी प्रवेशद्वार आहे ..दिंडी दरवाज्यासकट . ते ओलांडून पुढे गेले की थोड्याच वेळात एक फाटा येतो ..तेथे एक पाटी दिसते ..नाना फडणवीसांच्या वाड्याकडे . त्या छोट्या रस्त्याने आत गेलो की एक बखळ लागते ..तेथेच वाहनतळ आहे 

शेजारीच नानांचा वाडा दिसतो ..बरीच पडझड झालेली बाहेरून दिसते..आतून बघायची खूप इच्छा होती पण तो बंद होता ..पडवीत वाड्याची माहिती एका फलकावर लिहिलेली दिसली , दिसली ,पण वाचता आली नाहीत कारण ती पुसट झाली आहेत .

वाड्याच्या मागील बाजुस तो प्रसिद्ध  घाट आहे .संथपणे वाहणारी कृष्णा माई आणि आजूबाजूला दाट झाडी .पायऱ्या उतरून खाली आले की डाव्याबाजूला एक मोठा पार आहे .त्या पलीकडेच स्मशान ..उजवीकडे नजर टाकली की सुंदर दगडी पायऱ्या चा घाट ,त्या पलाकडे काठावर एक आणि दुसरे थोड्या उंचीवर अशी दोन सुंदर मंदिर . एक मेणेश्वरा चे म्हणजे शिवा चे आणि दुसरे वरचे श्री विष्णूचे .

 

खालच्या मंदीराच्या पुढे एक छोटेखानी घुमट असलेली वास्तू आहे .तीन चार पायऱ्या चढून गेल्यावर नजरेला पडते ती एक भली मोठी घंटा. ती जाड भक्कम साखळ्यानी  घुमटाला टांगलेली आहे .तिचे वजने एकदा टन तर सहज असेल .तिच्यावर मेरी आणि जीजस चे चित्र  व १७०७ अशी माहीती कोरलेली आहे.

ही घण्टा चिमाजी अप्पा  ? (का त्यांच्या भावाने  बाजीराव ) यांनी पोर्तुगीजाँन कडून जिंकून आणली असे सांगितले जाते . 

त्या काळी हिचे वाजणारे टोल अख्या वाईत ऐकू जात असणार .आता मात्र तो टोल ,जागेवर नाही ..,कोणी चोरला का फडनवीसांच्या वंशजांनी तो काढून ठेवला काही सांगता येत नाही .

मेणेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर . समोर एक मोठा नंदी .आत अंधार असल्याने नीट दिसले नाही ,पण तेथे बसलेल्या एकाने आत एक पिंड आहे असे सांगितले .

मंदिराला लागूनच कृष्णा नदी वहाते .मंदिराच्या मागील बाजूने एक छानसे वळण घेऊन ती नजरेआड होते .पण ते वळण फारच सुंदर आहे ..बाजूला असणारी , पाण्यावर  ओंडवी झालेली झाडी , संथ  पाणी , आणि शांतता त्याला एक गूढ रूप देते ...निसर्गाचे उत्तम चित्रच ..

नानां च्या काळात तर काय रम्य ,सुंदर ,शांत आणि स्वच्छ परिसर असेल ना हा ?  तेव्हा हा वाडा रहाता असेल , त्यात जिवंतपणा असेल वाड्यातील माणस , गाई ,गुरं , पक्षी प्राणी ह्यांनी हा घाट जगता रहात असेल ..वाड्याचे मागचे दार घाटावरच उघडते .वाईच्या मुक्कामी असताना नाना एखाद्या सायंकाळी ,निवांत क्षणी येथे येऊन बसत असतील ,कोजागिरी पौर्णिमेला इथे विविध खेळ रंगले असतील , वाड्यातील सगळी कार्ये , व्रत वैकल्ये , आनंदी ,मंगल अमंगल सर्वच घटना ह्या घाटाने बघितल्या असतील .

आतासुद्धा वेगळ्या ऋतूं मध्ये या घाटाची शोभा बदलत असेल ..उन्हाळ्यात पाणी आटले की आतापेक्षा दहा पंधरा पायऱ्या उघड्या पडत असतील ,रखरखाट नकोसा होत असेल पाण्यावर येणारी माणस आणि गुर लगेच झाडाचा आसरा शोघत असतील ..काही लोक गाभाऱ्यातील थंडावा घेत तिथेच लवंडत असतील ...

पावसाळ्यात तर हे रूप पूर्णपणे बदलत असेल ..कृष्णा दुथडी भरून वहात असेल , पाणी आखून दिलेली सीमारेषा तोडून सर्व पायऱ्या गिळंकृत करून मंदिरा पर्यंत येऊन टेकत असेल ...सगळीकडे घसरडे झाले असेल , सर्वत्र हिरवं रान दाटले असेल , एखादा गावकरी गळ टाकून बसला असेल ..

तर थंडीत कळोख लवकर पडत असेल .पक्षी  आपल्या घरटी लवकर परतत असतील ..पाण्यावर काळा रंग जास्तच गूढता वाढवत असेल , लोक काठावर शेकोट्या पेटवून , बार भरून गप्पा हाणत असतील ,त्यात गावातील भानगडी , भूत खेत ह्याचा तडका असेल .

पहाटे पहाटे नदीवर दाट धुक्याचा थर जमा होत असेल , धुकं आणि पाणी नककी कुठंल हे सांगता येण अवघड होत असेल ... 

ह्या घाटाने अनेक स्थित्यंतरे बघितली असणार.. पूर्वीचा ऐतिहासिक काळ ते सध्या येथे होणारे अनेक सिनेमांच चित्रीकरण ..सर्वांना तो साक्षी आहे ...

जवळजवळ तीनशे वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरी वाडा, बाहेरून जरी पड्का झालेला असला तरी घाट उत्तम स्थितीत आहे जर नीट काळजी घेतली गेली तर अजून काही शतके त्याला काही डग नाही हे जाणवते व ही जाणीव खरी ठरो हीच त्या मेणेंश्वरा जवळ प्रार्थना...

सुनील गाडगीळ 

०१.११.२०१६

Monday 19 September 2016

वाट

वाट

सरळ तर कधी नागमोडी 

वाट तशी अवघड पण तरीही सोपी

घेऊन जाते आपल्याला, असतो  शेवटी, शेवट 

नसते माहित मनाला,  धरते भीती सावट

संपेल का ती वाट कधी,   मिळेल का  निवृत्ती 

का परत पाऊली पाठवेल 

इतक्यात कुठली आल्येय मुक्ती 

सुनील

०३.०९.१६

Sunday 18 September 2016

संपले सारे

संपले सारे

माझ्या सासूबाई  ..वय वर्ष ७८ ..गेली अनेक वर्षे डिमेन्शिया ने ग्रस्त .

आजाराची  सुरवात कधी कशी झाली हे कळलेच नाही .

स्वयंपाक , घरची काम , नवऱ्याला काही हवे नव्हे सगळे करायच्या . वजन ही बऱ्यापैकी होते . आमचे लग्न ठरले तेव्हा त्यांच्या अंगात यायचं ,त्या दोन्ही हातातून हळद ,कुंकू काढायच्या असे कानावर पडले होते ,पण अशा गोष्टींवर  माझा विश्वास नसल्यामुळे मी त्यात जास्त लक्ष घातले नाही .देवावर प्रचंड श्रद्धा .

नवरा म्हणजे सर्वस्व ..प्रति देवच .

२० एक वर्षापूर्वी हृद्ययाचा प्रॉब्लेम सुरु झाला ..हार्ट एन्लार्जमेन्ट ...डॉक्टरनी कडक पथ्ये सांगितली ,ती कायम तंतोतंत पाळल्यामुळे प्रकृती हळुह्ळु सुधारली .

ह्या बाईने त्या वेळीस मीठ जे सोडले ते कायमचे अगदी शेवट पर्यंत .

नंतर दोघांची वय वाढल्या  मुळे त्यांना एकट ठेवण आम्हाला प्रशस्त वाटेना ,त्यामुळे त्यांना आमच्या घरी आणून ठेवले .पथ्य पाणी , स्वतंत्र खोली , टीव्ही त्यामुळे त्यांचा वेळही मजेत जात होता . वर्षा खूप करायची .

सहा महिन्यांनी थोडा बदल म्हणून त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीकडे पाठवले .मग अनेक वर्ष तसाच पायंडा पडला .सहा महिने इकडे सहा महिने तिकडे ..

आणि एके दिवशी वर्षाचे वडील अचानक गेले .

अचानक बसलेल्या धक्क्यातून सासू कोलमडली .  इतक्या वर्षांचा सहवास तटकन तुटला . इतकी वर्षे नवऱ्याचे थोडेफार बॉसिंग होते ,आणि जे तिला आवडत होते ,ते संपले .एक पोकळी निर्माण झाली आणि तिथूनच डोक्यातले घड्याळ बहुतेक बिघडले . ..पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टींचे विस्मरण , नंतर काही वर्षात पाटी कोरी ....

प्रश्न विचारले की एकटक बघत बसणे ,मग आपण आठवण करून दिली की थोडेफार आठवायचे ..पण तेव्हड्या पुरतेच .

दोन एक वर्षा पासून आजार जास्तच बळावला.मी कोण असे विचारले तर " डॉक्टर ""बाबा" असे काहीही बोलायच्या .पण आश्चर्य म्हणजे त्यांना खुप आधीचे म्हणजे  त्यांच्या लग्ना आधीचे आठवायचे ..तुमचे नांव काय असे विचारल्यावर आपले माहेरचे नांव सांगायच्या .

दिवस जात होते आणि त्या अचानक सिरीयस झाल्या . सर्दीचे निमित्त होऊन  त्यातून त्याना निमोनिया झाला. दोन्ही फुफ्फुस पाण्याने भरली. पौड रस्तावरील एका रुग्णालयात त्यांना भरती केले.

डॉक्टरांनी तपासून निमोनिया झाला असून दोन्ही फुफ्फुस पाण्याने भरली असल्याचे सांगितले ,तसेच अशक्तपणा खूप आहे आणि बी पी अगदी वाईट आहे आणि त्यांची स्थिती अतिशय क्रिटीकल असल्याचे सांगितले.

त्यांना आम्ही icu मध्ये ऍडमिट केले  कुठल्याही life support  सिस्टिम चा वापर करायचा नाही हे आम्ही सर्वांनी विचारांती आधीच ठरवून टाकले होते .

काहीच उपयॊग होणार नसेल तर  लेट नेचर टेक इट्स ओन कोर्स , वी विल मेक अँड हेल्प  हर पास अवे पिसफुली असे मी त्या डॉक्टरना सांगितले .त्यांनी त्यास मान्यता दिली व एक दिवस आय सी यु मध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी काय ते बघून ठरवू असा सल्ला दिला .आम्ही त्यास होकार दिला .

 फुफ्फुसातील पाणी काढण्याचे प्रयन्त सुरु झाले .पण अतिशय अशक्तपणा ,चांगले नसलेले हृदय ह्यामुळे त्यांना  ते झेपेनासे झाले व ते प्रोसिड्यूर थांबवावे लागले . त्या मधल्या वेळात औषधे चालूच होती .

आता रात्री तेथे थांबून काहीच फायदा नसल्याने आम्ही सगळे जण घरी गेलो.

मी सकाळी परत गेलो असता त्याच्या वर उपचार करणारे डॉक्टर भेटले . मी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नो होप्स  ..जास्तीत जास्त २४ तास असे सांगितले .

आता आम्हाला पूर्ण कल्पना आली .

मी तेथेच बसून राहिलो.अधून मधून आत जायच ,त्यांना  बघायचे ,मागील भिंतीवर लावलेल्या मॉनिटर वरच्या आकडयांचे " खेळ"बघायचे व परत बाहेर येऊन बसायच अस चक्र सुरु झाले .

मॉनिटर वरच्या आकडे १२९ ते १२० व ८८/८०/७८ असे आकडे दर्शवत होते . त्यावरून वरच्या ओळीतले म्हणजे हार्ट बिटस ,खालचे म्हणजे बी पी आणि त्या खाली किति श्वास ओढला जातोय ते दर्शवित होते . 

ते आकडे कधी कमी कधी जास्त होत होते घेतलेल्या प्रत्येक श्वासा बरोबर ते बदलत होते जसे ते बदलायचे तसे माझे विचार ही बदलायचे .,हार्ट बिट्स वाढले की , अरे आता थोडा सुधार दिसतो असे वाटायचे तेव्हड्यात ते खाली घसरले की धस्स व्हायच .आशा निराशेचा खेळ चालू होता .

वेळ जात होता ..

मधेच मी त्यांच्या  बघायचो . एकेकाळची सुधृढ बाई आता हाडाचा सापळा होऊन पडली होती . नाकात ऑक्सिजन ची नळी ,गळयात कट घेऊन घातलेली ट्यूब ,त्यातून जाणारे औषध ,गळ्यापर्यंत ओढून घेतलेली चादर आणि एक वेगळीच नजर .. डोळे बहुतांशी वेळा बंद होते पण मधेच त्या  ते उघडून बघायच्या , बघायच्या पण मान तिरकी करून . त्यांच्या बेड च्या मागेच खिडकी होती .ती जरी बंद होती तरी त्यातुन प्रकाश आत येत होताच . त्यांची भकास नजर त्या प्रकाशा कडे वळायची .थोडा वेळ झाला की मान सरळ करुन ,आपण नकारार्थी हलवतो तशी हलवून परत डोळे बंद करून घ्यायच्या . ते दृश्य वारंवार बघून माझ्या डोक्यात वादळ उठले . काय होतय त्यांना ? तिकडे काय बघत आहेत सारख्यया आणि मानेने नाही नाही काय म्हणताहेत  आणि कोणाला ? 

त्यांना  पैलतीर तर दिसू लागला नसेल ना ? तिकडून कोणी बोलवत तर नसेल ना आणि जीवनाची आसक्ती त्यांना  हा काठ सोडून तिकडे जायला आडकाठी तर करत नसेल ना ? काय चालले असेल आत्ता त्यांच्या मनात ? 

ज्या मनात इतक्या वर्षात काहीच खळबळ उडाली नाही , स्मृतीचे कुठलेच तरंग उठले नाहीत त्यात आता एकदम कसे बदल झाले ? दिवा विझण्या आधी मोठा होतो तसे तर नाही ना ? का तसे काहीच नाहीये , थकलेल्या स्नायुंची रिफ्लेक्स action होते आहे ?काहीच बोध होईना...दोन तीन तास असेच गेले..

संध्याकाळ झाली आणि आकडे झपाट्याने बदलू लागले .इतका वेळ आशा जागवणारे आता अशुभाची सूचना देऊ लागले होते .

७८-७० / ६० - ५०/ २०-१० / ५---- बीप ...बीप..., बीssssप..

 संपले सारे..

मी मॉनिटर वरची नजर काढून त्यांच्या  कडे बघितले  तर त्या  शान्त पणे झोपल्या सारख्या वाटत  होत्या .काल पासून ...नाही खरं तर १५-२० वर्षे चाललेली तडफड थांबली होती ..स्मृती विस्मृती चा तो जीवघेणा पाठलाग थांबला होता ..

सुनील

०७.०९.२०१६